अजित पवारांच्या आव्हानावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
पुणे : शिरूरमध्ये उमेदवार निवडणून आणणारच, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलं आहे. यावरून, खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १०० टक्के मी निवडणूक लढवणार, असं ते म्हणाले.
अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असं वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचं अजित पवारांनी कौतुक केलं आहे. पदयात्रा सूचण्याचा विषय नाही. कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी आमच्या सुरात सूर मिसळला पाहिजे.
मी शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी कंल आहे. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. याचा निर्णय शरद पवार घेतील, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – ‘लोकसभेच्या ४८ जागा ताकदीने लढवणार’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच, असं अजित पवार म्हणाले.