तीन दिवसांत १४१ खासदारांचं निलंबन; शरद पवार आक्रमक, म्हणाले..
मुंबई : संसदेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षातील जवळपास १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज ४९ खासदारांना निलंबित केलं गेलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक होत या निलंबनाचा निषेध केला आहे.
शरद पवार म्हणाले, संसदेत जे काही घडलं ते योग्य नव्हतं. सत्ताधारी पक्षाच्याच सदस्याच्या पासवर दोन तरूण लोकसभेत आले. तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या मारल्या, गॅस फोडला. संसदेच्या परिसरातही काही युवकांनी गोंधळ घातला. ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथं ५०० पेक्षा जास्त खासदार बसतात. त्यामुळे या खासदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या घडल्या प्रकाराची माहिती आम्हाला द्या.
हेही वाचा – IPL 2024 Auction : पॅट कमिन्स ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
संसदेत येणारे हे लोक कोण होते. त्यांचा हेतू काय होता? याची माहिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षातील खासदारांनी केली. त्यांना माहिती न देता उलट त्यांच्यावरच कारवाई केली गेली. याचा अर्थ संसदीय लोकशाहीची प्रतिष्ठेचं सरकारला गांभीर्य नाही. उलट या खासदारांवरच कारवाई केली गेली. मग सुप्रिया सुळे असो अमोल कोल्हे असो की अन्य खासदारांना निलंबित केलं, असं शरद पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांना सात वेळेला संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. नियम मोडायचा नाही, हे आमच्या पक्षाचं धोरण आहे. आमचे नेते नियम मोडत नाहीत. असं असताना केवळ काय घडलं याची माहिती द्या, अशी मागणी केली असता कारवाई करणं हा सरळ सरळ सत्तेचा गैरवापर आहे, असंही शरद पवार म्हणाले.