‘मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते १७ डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा..’; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
![Manoj Jarange Patil said what decision was taken regarding Maratha reservation by December 17](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Manoj-Jarange-Patil-1-780x470.jpg)
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यापांसून चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते १७ डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा १७ तारखेला ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे, असा अल्टिमेटम जरांगेनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय झाले? हे १७ तारखेपर्यंत सांगा. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आतापर्यंत काय झाले, हे स्पष्ट करा. अन्यथा १७ तारखेला ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे. तसेच १७ तारखेला मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या बैठकीत सरकारकडून आरक्षणासंदर्भात काय झाले आणि पुढे आंदोलन कसे करायचे? यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – दीपिका पादुकोणला हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई
आम्हाला आता टिकणारे आरक्षण हवे आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने आरक्षण दिले तर ते पुन्हा कोर्टात टिकणार आहे का? तुम्ही दिलेल्या आरक्षणानंतर आणखी कोणी न्यायालयात गेले तर आम्ही पुन्हा लढतच राहायचं का? यामुळे आम्ही ओबीसीमध्ये आहोत. आम्हाला ओबीसीचे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे क्यूरेटीव्ही पिटीशन दाखल झाली आहे. परंतु त्याऐवजी आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या. ते आम्ही स्वीकारणार आहोत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना आपणास गोळी मारली जाईल, असा अहवाल पोलिसांचा असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ हे खोटे बोलत आहेत. फडणवीस यांनी त्यांचा वापर करून पवारांना संपवले. परंतु भुजबळ यांनी मराठा समाजबद्दल बोलू नये.