‘..म्हणून कपिल देव यांना वर्ल्डकप फायनलचं आमंत्रण दिलं नाही’; संजय राऊतांचा मोदींना टोला
![Sanjay Raut said that Kapil Dev was not invited to the World Cup final](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Sanjay-Raut-2-780x470.jpg)
मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्याला भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि बीसीसीआयवर टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत म्हणाले, भारताचा पराभव झाला, त्यामुळे लोकांना वाईट वाटलं, त्यात आपणही सहभागी व्हायला हवं. अर्थात भारतीय संघ उत्तम खेळला. ते हरले तरी त्यांचं अभिनंदन करायला हवं कारण त्यांच्यात जिंकण्याची जिद्द होती. तसेच भाजपाच्या दुःखात मी सहभागी आहे. कारण, भाजपा अशा थाटात होती की, वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत, भारत वर्ल्डकप जिंकला असता तर आनंदच झाला असता. परंतु, ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं, भाजपाकडून निकालानंतरची ज्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. दुर्दैवाने त्यावर पाणी फेरलं गेलं.
हेही वाचा – छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती, भाविकांची अलोट गर्दी
India's legendary cricketer Kapil Dev was not invited to World Cup final match. The cricket icon has been insulted brazenly, India has been humiliated…What a big shame ? BCCI, ICC should explain to the world whether they did so under pressure from rulling party of india? They… pic.twitter.com/a3gxLSo89G
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांचं एक निवेदन मी ऐकलं. ज्यांनी या देशातला सर्वात पहिला विश्वचषक मिळवून दिला. भारत जगज्जेता आहे आणि पुढेही होऊ शकतो असा विश्वास ज्यांनी या देशाला दिला, त्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला म्हणजेच कपिल देव यांना आणि त्याच्या संघाला अंतिम सामन्यासाठी आमंत्रित केलं नाही. कारण, कपिल देव यांचं तिथे आगमन झालं असतं तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं. त्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत हरला याचं दुःख असलं तरी ज्या प्रकारचं राजकारण पडद्यामागे चालू आहे, त्यावर देशात नक्कीच चर्चा होईल, असंही संजय राऊत म्हणाले.