‘शरद पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये’; सागर मच्छिंद्र तापकीर
पिंपरी : शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. अनेक सर्वसामान्य घरातील लोकांना आमदार, खासदार केले. महाराष्ट्रातील जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार आहे तो केवळ आणि केवळ आदरणीय पवार साहेबांमुळे आहे. असे असताना पक्षाच्या विचारधारेच्या विपरीत जाऊन, विकासाचे घोंडगे पांघरून काही मंडळी सत्ताधारी पक्षात सामील झाली आहेत. ज्या साहेबांनी तुम्हाला मोठे केले, मानसन्मान दिला, त्या पवार साहेबांना उतार वयात तुम्ही निवडणूक आयोग दाखवला. अश्या गद्दारांनी आम्हाला शिकवू नये असा घणाघात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष (शरद पवार गट) सागर मच्छिंद्र तापकीर यांनी केला.
नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांनी युवक मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत अजितदादांनी गुजरात गेलेले मोठे प्रकल्प परत आणावेत असे आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाचे युवक काँग्रेस अध्यक्ष शेखर काटे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही अशी टीका केली होती. या टिकेला आत्ता राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष (शरद पवार गट) सागर मच्छिंद्र तापकीर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा – चऱ्होलीतील वाघेश्वर मंदिर परिसरात होणार ‘परंपरा-संस्कृती जतन’
सागर तापकीर पुढे म्हणाले, भाजपमुळे कधी काळी देशात नंबर एक असलेले आपले महाराष्ट्र राज्य पिछाडीवर जात आहे. मोदी परदेशात जातात, मात्र फक्त गुजरातसाठी रोजगार घेऊन येतात. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप कडून राबविला जात असून, धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचा भाजपचा डाव आहे. भाजप आणि त्यांच्या सोबत गेलेल्यांना आम्ही पुरून उरु आणि पुन्हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रात पक्का करू असा विश्वास सागर मच्छिंद्र तापकीर यांनी व्यक्त केला.
युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी युवकांच्या बेरोजगारीवर प्रश्न केले. भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मध्ये प्रश्न करण्याची स्वतंत्रता आहे. एखाद्या मुद्द्यावर प्रश्न केले गेल्यास त्याचं तांत्रिक उत्तर न देता जागा दाखवण्याची भाषा केली जात आहे. यावरून शेखर काटे राजकीय अपरिपक्वताच निदर्शनास आणून दिली आहे, असेही सागर मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे. युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे नेतृत्वामध्ये पिंपळे गुरव येथील महाराष्ट्रभिमान युवक मेळाव्यास मिळालेला भरघोस प्रतिसाद बघून नैराश्यतून अशा प्रतिक्रिया देत असल्याचा आरोप देखील केला. येणाऱ्या काळात, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी च्या दोन्ही गटातील संघर्ष कोणत्या स्थराला जातो हे पाहणे औस्युक्याचे ठरणार आहे.