सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हे कडाडले
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून लोकसभेत मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी अनेकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदास हल्लाबोल केला आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल अमोल कोल्हे यांनी सरकारला केला आहे.
अमोल कोल्हे यांना अवघी अडीच मिनिटं आली. ते म्हणाले, मी सरकारविरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या समर्थनार्थ बोलत आहे. सरकारच्या या कार्यपद्धतीकडे पाहून मला गांधीजींच्या तीन माकडांची आठवण येते. सरकारच्या विरोधात काहीही एकू नका, निवडणुका सोडून देशाची काय परिस्थिती आहे ते नका पाहू..आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलती बंद करा.
या सरकारवर नेमका कसा विशअवास ठेवायचा? जे सरकार महागाईवर बोलत नाही, जे सरकार आर्थिक वाढीचे आकडे तर फेकतात पण दरडोई उत्पन्नावर मात्र बोलत नाहीत. गृहमंत्र्यांनी काल खूप योग्य वक्तव्य केलं की, आकडे कधी खोटं बोलत नाही. यामुळे अर्थव्यवस्था जेव्हा पाचव्या क्रमांकावर पोहचते तेव्हा दरडोई उत्पन्नात देश १४१ व्या क्रमांकावर आहे. तर काय देशाची संपत्ती ही निवडक लोकांच्याच हातात जात आहे? असं अमोल कोल्हे म्हणाले.
हेही वाचा – पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला वाढता विरोध!
या सरकारने अनेक भाषणांमध्ये शेतकरी सन्मान निधीबाबत वक्तव्य केलं. पण खते आणि बियाणांच्या किंमती चार ते पाच पटीने वाढ झाली..याबाबत ते बोलले नाही. आता अर्थमंत्री बोलत होत्या तेव्हा त्यांनी टॉमेटोच्या बाबतीत हस्तक्षेपाबद्दल भाष्य केलं. पण मागील चार-पाच वर्षांपासून आमचे शेतकरी टॉमेटो रस्त्यावर फेकत होते तेव्हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार गेलं नाही. तीच अवस्था आज कांद्यांच्या किंमतीबाबत आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त माझ्या मतदारसंघातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. याचं कारण आपले चुकीचे निर्यात धोरण आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
६३ मून्स टेक्नॉलॉजीसारखी कंपनी १३ हजार गुंतवणूकदारांचं नुकसान करते. ५६०० कोटींचा घोटाळा करते पण तरीही महाराष्ट्राचं सरकार एमपीआयडी कायद्यातंर्गत त्यांच्यावर कारवाई करत नाही..हे कोणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे? यामुळेच जे सामान्याचं सरकार नाहीए..अशा सरकारवर आम्हाला विश्वास नाहीए मी अविश्वास प्रस्तावाचं समर्थन करतो. नुकतंच पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर मी ही गोष्टही लक्षात आणून देतो इच्छितो की..लोकमान्य टिळकांच्या एका वाक्याबाबत..सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? हे आत्मचिंतन व्हायला हवं. असंही अमोल कोल्हे म्हणाले.