‘..तेव्हा फडणवीस प्राथमिक शाळेत असतील’; शरद पवारांची खोटक टीका
मुंबई : शरद पवार यांनी जे केलं ते मत्सुद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल? असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला होता. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत असतील, असं टोला शरद पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
शरद पवार म्हणाले की, मी बेईमानी कधी केली? कधी केली बेईमानी फडणवीस यांनी सांगावं. १९७७ मध्ये आम्ही सरकार बनवलं. त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप माझ्यासोबत होता. उत्तमराव पाटील भाजपचे नेते होते. ते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान होते तेव्हा त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनवलं ते सर्वांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये जनसंघाचे हशू आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात. त्यापैकी वेगळं काही नाही
हेही वाचा – परदेशवारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार E-Passport
विरोधी पक्षाचे १९ पंतप्रधान भेटले होते, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावरून शरद पवार म्हणाले की, असं भाष्य करणं पोरखेळपणा आहे. त्या बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तणावावर चर्चा झाली. राज्य आणि धर्म आणि यातून मतभेद वाढणं चिंताजनक आहे. त्याला आवर घालण्यासाठी चर्चा झाली. काही तथाकथित नेते बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अरे लोकशाहीत बैठक घेऊ शकत नाही का? तुमच्या बैठका चालतात आमच्या का नाही चालत? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
अजित पवार यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. हा निर्णय कोणी एकटा घेत नाही. पक्षातील प्रमुख नेते निर्णय घेतील. सर्वांनीच पक्षाच्या कामात भाग घ्यावा अशी सर्वांची भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यापलिकडे त्यात काय नाही, असं शरद पवार म्हणाले.