शिंदे गटात प्रवेश करताच मनीषा कायंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल; म्हणाल्या..
मुंबई : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, मनीष कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, ठाकरे गटात महिला आघाडीची वर्षभरापासून घुसमट होत आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत, ती मी सविस्तर केव्हातरी सांगेन. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि ते मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा चालवणारी शिवसेना असू शकत नाही. आम्हाला वाटलेलं वर्षभरात बदल होईल, परंतु तसं काही झालं नाही.
हेही वाचा – दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
https://twitter.com/mieknathshinde/status/1670506792663797761
मला उद्धवजींनी आमदार केलं, विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली, त्यासाठी मी त्याचे आभार व्यक्त केले आहेत. परंतु मला पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा होती. मला त्याचा मोठा अनुभव आहे. परंतु तिथे मला त्यावर कधीच काम करता आलं नाही. मला संघटनेत जबाबदारी हवी होती. पण ती मिळत नव्हती. आमच्या देवी देवतांना ज्यांनी शिव्या घातल्या, त्यांची खिल्ली उडवली, ते लोक शिवसेनेचा चेहरा कसा काय होऊ शकतात? हा प्रश्न मला सतावत होता. काँग्रेसमधून काही जण येतात आणि मग ते आम्हालाच काहीतरी शिकवतात. ते सहन होत नव्हतं. मी वयाच्या २५ व्या वर्षीपासून शिवसेनेची मतदार आहे. पूर्वी भाजपात असले तरी विचारांनी शिवसैनिक आहे. नुकतंच सकाळी उठून आपण एकमेकांवर टीका टिप्पणी करायची, त्यापेक्षा सकारात्मक काम करायची माझी इच्छा होती, असंही मनीषा कायंदे म्हणाल्या.