Weather Update : बंगालच्या उपसागरातील चक्रिवादळामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट

मुंबई : बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोचा नावाच्या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे वादळ म्यानमारच्या दिशेने वळले आहे. त्यामुळे या वादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे. मात्र या वादळामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पुणे शहरात मे महिन्याच्या सुरूवातीला अवकाळी पाऊस होता. त्यामुळे तापमान ३५ अंशांच्या जवळपास होते. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात बदल होत आहे. ११ मे रोजी पुणे शहरातील कमाल तापमानाने नवा उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा – ‘नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही चूक होती’; अजित पवार
पुण्यातील कोरोगाव पार्क परिसरात तापमान थेट ४४.४ अंश सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे असह्य करणारा उन्हाचा चटका सध्या पुणेकरांना बसत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर चटका देणारे ऊन जाणवू लागत आहे. त्यानंतर दुपारी १२ नंतर चटका आणखी वाढत आहे. यामुळे दुपारी रस्तेही ओस पडत आहेत.
मध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधसाळेने वर्तवली आहे. राज्यातील कमाल तापमानात आणखीन वाढ होणार असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा चांगला तापला असून, बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान ४० शीच्या पुढे गेले आहे.





