कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रूपये सानुग्रह अनुदान देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई : काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी हावालदिल झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. देशातील इतर राज्यातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घरसण झाली आहे. कांदा नाशवंत पीक असल्याने त्याला किमान आधारभूत किंमत लागू करता येत नाही. कांदा महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक असून त्याला मिळणारा भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील जिव्हाळ्याचा भाग आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
देशातील कांदा उत्पादन त्याची देशांतर्गत मागणी व देशातून होणारी निर्यात इत्यादी सर्व बाबींचा परिणाम बाजारपेठेतील कांद्याच्या दारावर होतो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने एक समिती नेमली होती. समितीने २०० आणि ३०० रूपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिवासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.