मोदी, शहा यांचे धोरण ‘खुदका साथ खुदका विकास और देश का विश्वासघात’; डॉ. कैलास कदम
![Dr. Modi, Shah's policy of Khudka Saath Khudka Vikas aur desh ka betrayal Kailas Kadam said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Kailas-Kadam-780x470.jpg)
‘हात से हात जोडो’ अभियानाचे सांगवीत उद्घाटन
पिंपरी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या हात से हात जोडो या अभियानाचा शुभारंभ सांगवी येथील स्व. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मृतीस्थळ येथे पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर , डॉ. मनीषा गरुड, निर्मला खैरे, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, उमेश बनसोडे, मिलिंद फडतरे, प्रा. किरण खाजेकर, झेवियर एंथनी, पांडुरंग जगताप, सतीश भोसले, अण्णा कसबे, विजय इंगळे, फिरोज तांबोळी, शैला कदम, संतोषी चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आठ वर्षापूर्वी त्यांनी दिलेले बेरोजगारी, महागाई, काळा पैसा देशात आणणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देणे, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणे, महागाई रोखणे, इंधन व जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणे यापैकी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. तर उलट देशातील सार्वजनिक उद्योग विकायला काढले आहेत. 65 वर्षात देशातील कष्टकरी, कामगारांनी शेतकऱ्यांनी देशाच्या विकासात हातभार लावला. त्यांच्या कष्टातूनच केंद्र सरकारने सार्वजनिक उद्योग उभारले हे सार्वजनिक उद्योग विकण्याचा सपाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी सुरू केला आहे. देशातील सार्वजनिक उद्योग विकणारे दोघे गुजराती आणि हे सार्वजनिक उद्योग खरेदी करणारे अंबानी, अदानी हे देखील गुजराती आहेत. यांनी देशाचा विकास केला नसून देशाचा विश्वासघात केला आहे. हेच सर्वसामान्य नागरिकांना घरोघरी जाऊन सांगण्यासाठी काँग्रेसने हात से हात जोडो हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपची चुकीची धोरणे नागरिकांना घरोघरी जाऊन सांगावीत आणि खासदार राहुल गांधी यांचे पत्र नागरिकांना द्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना भाजपने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील पाच वर्षात भाजपची सत्ता असताना स्थायी समितीचे अध्यक्ष यांना पोलिसांनी महापालिका भवनात लाच स्वीकारताना पकडले. अशा भ्रष्टाचारी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीची माहिती देणार आहेत. तसेच केंद्रातील भाजप सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते ते देखील पाळले नाही. गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याऐवजी महागाई रोज वाढत आहे. याची तरुणांना व महिला भगिनींना घरोघरी जाऊन माहिती देणार आहेत, असेही डॉ. कदम म्हणाले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/image-23-1024x486.png)