“महाराष्ट्रात येताना बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करुन यावं”; दानवेंचा जे.पी. नड्डा यांच्यावर टोला
![Ambadas Danve said that Balasaheb Thackeray should be recited while coming to Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Ambadas-Danve-and-jp-nadda-780x470.jpg)
संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आहे
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय आध्यक्ष जे.पी.नड्डा हे महाराष्ट्र दैऱ्यावर आले आहेत. यावेळी औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेचं आयोजन केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्याऐवजी बाळासाहेब देवरस असा केला, त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जे.पी. नड्डा आणि भाजपवर हल्लाबोल केला.
बाळासाहेब ठाकरे हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा बाळासाहेब देवरस असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!, असा सवाल अंबादास दानवे यांनी जे,पी नड्डा यांना केला आहे.
जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणे! सर्वाधिक रिकाम्या खुर्च्या असल्याचा विक्रम पण आज भाजपच्या नावे नोंदवला गेला असावा. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.
औरंगाबादमध्ये भाजपच्या सभेला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड संबोधित करत असताना देखील सभेला उपस्थित असणाऱ्या महिलांनी मैदानातून काढता पाय घेतला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला यश आलं नाही, असंही दानवे म्हणाले.
सोबतच, विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र असं ठरलं होतं. उद्धव ठाकरेंनी भाजपला खुर्चीसाठी धोका दिला. बाळासाहेब देवरस यांनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात लढा दिला त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं, असं जे.पी. नड्डा म्हणाले.