गोखले पूल हलक्या वाहनांसाठी खुला
मुंबई : अंधेरी येथील गोखले पूल धोकादायक झाल्याच्या कारणास्तव बंद करण्यात आलेला असला तरी हा पूल पादचारी आणि दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का? याची आता चाचपणी सुरू आहे. याकरिता पुन्हा पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असून आठवडय़ाभरात याबाबतचा अहवाल पालिका तयार करणार आहे.
अंधेरीचा गोखले पूल सोमवारपासून अचानक बंद केल्यामुळे या परिसरात वाहनचालकांना वाहतूक खोळंब्याला सामोरे जावे लागते आहे. या पुलाचे संपूर्ण बांधकाम करण्याचे पालिकेने मान्य केले असून त्यानुसार पालिकेचा पूल विभाग कामाला लागला आहे. पालिकेने त्याकरिता निविदा मागवल्या आहेत. तर रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा धोकादायक भाग पडण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र हा पूल पुढचे काही दिवस हलक्या वाहनांसाठी, पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार अमित साटम, पालिका अधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा गोखले पुलाची पाहणी केली.
या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग व जुना पूल धोकादायक झाला असून तो तात्काळ पाडून टाकावा, असा अहवाल पालिकेच्या सल्लागाराने नियमित तपासणीनंतर दिला होता. त्यानंतर युद्धपातळीवर पूल बंद करण्यात आला होता. मात्र त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पश्चिम उपनगरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. गेल्या रविवारी यात अधिकच भर पडली. त्यामुळे हा पूल पादचाऱ्यांसाठी, दुचाकी, रिक्षा अशा हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची आता तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता पालिका व्हीजेटीआय या प्रसिद्ध संस्थेची मदत घेणार असल्याचे समजते. मात्र हा अहवाल येण्यात आठ-दहा दिवस लागणार असून त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.