हार्दिक पटेल यांच्या उपोषणात मध्यस्थी करण्याची आठवलेंची तयारी
अहमदाबाद – पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेले काही दिवस बेमुदत उपोषणाला बसलेले त्या समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि सरकार यांच्यात तडजोड करण्यासाठी मध्यस्थी करण्याची आपली तयारी आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
हार्दिक पटेल याच्या उपोषणामुळे गुजरात मध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे प्रतिपादन केले.ते म्हणाले की हे आंदोलन सरकारने वेळीच परिणामकारकपणे हाताळले नाही तर त्याचा गुजरात मध्ये लोकसभा निवडणुकीत दोन ते तीन जागांवर भाजपला फटका बसू शकतो असे ते म्हणाले. भाजपबरोबर राहीलात तर तुम्हाला अपेक्षित असे साध्य करता येईल पण कॉंग्रेस बरोबर राहीलात तर तुम्हाला काहीही साध्य करता येणार नाही असे मी हार्दिक पटेल यांना या आधीच बोलताना सांगितले आहे असे ते म्हणाले.
खुल्या गटातील सर्वच जातींना आरक्षण देण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. सध्या महाराष्ट्रात मराठा आणि हरियानात जाट आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांनाही योग्य प्रमाणात आरक्षण मिळाले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. घटनेत बदल करून आरक्षणाचे प्रमाण 50 टक्कक्यांहून अधिक करण्यात यावे सध्याच्या आरक्षणाच्या प्रमाणात आणखी 25 टक्के जागा वाढवाव्यात असे प्रतिपादनही त्यांनी केले.
आगामी लोकसभा निवडणुकीतील राजकीय चित्र कसे राहील या विषयी बोलताना ते म्हणाले की या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तीस ते चाळीस जागा कमी होतील पण एनडीएच सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे