खासगी रुग्णालयांकडून रक्तद्रवसाठी दबाव
वसई |
वसई-विरार शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असतानाच खासगी रुग्णालये आता रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांना रक्तद्रव देण्यासाठी तगादा लावत आहेत. दाते पुढे येत नसल्याने रक्तद्रव आणायचे कोठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात आता खासगी रुग्णालयांकडून रक्तद्रवची मागणी होत आहे. शहरात रक्ताचा पुरवठा अपुरा असताना रक्तद्रवसाठी दाते पुढे येत नसल्याने ते मिळणे कठीण झाले आहे.
खासगी रुग्णालये त्यांच्याकडून बरे होऊन गेलेल्या करोना रुग्णांची यादीही करोना रुग्णांच्या नातेवाईकांना देत नाहीत. मग नवीन रक्तद्रव दान करण्यासाठी दाते पुढे कसे येतील हा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. याबाबत माहिती देताना रुग्णमित्र व आतापर्यंत सहा वेळा रक्तद्रव देणारे राजेंद्र ढगे यांनी रक्तद्रव म्हणजे रामबाण उपाय नाही असे सांगितले. त्याच्या उपयुक्तता मूल्याविषयी स्पष्टता नसताना खासगी रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्तद्रवसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप केला. रक्तद्रव दान करण्यासाठी पालिकेने जनजागृती करण्याचे आदेश सर्व खासगी रुग्णालयांना द्यावे, तसेच पालिकेतर्फे यासाठी मदत कक्ष सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.