मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा ः आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, परीक्षेच्या तारखाही सांगितल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Arogya-Sevak-Bharti-700x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष । प्रतिनिधी ।
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघालेली होती. त्यावेळी साडे अकरा लाख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. परंतु कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे तसेच महापोर्टलच्या रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही. परंतु नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा होती. सुमारे साडे अकरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांनी परीक्षा शुल्कही भरलं होतं. परंतु विविध कारणांनी परीक्षा झाली नाही. मात्र सत्तेतलं नवं सरकार युवकांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसार पुढच्या २ महिन्यात आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
कोविड काळात राज्यात मागील दोन ते अडीच वर्षात कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यात वैद्यकीय सहायक, आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोविड काळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे.