सप्तश्रृंग गडावरील पायऱ्यांवर बोकड बळीस सशर्त परवानगी
नाशिक : कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अटी-शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
प्रशासनाने पाच वर्षापूर्वी बोकड बळी देण्याची प्रथा बंद केली होती. प्रशासनाच्या निर्णयाविरुध्द सुरगाणा तालुक्यातील धोंडाबे येथील आदिवासी विकास संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड. दत्ता पवार यांनी बाजू मांडली. यासाठी भाविक सोनवणे, सप्तशृंगी गड, नांदुरी आणि परिसरातील गावांतील ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. गडावर नवरात्रोत्सवाचा समारोप दसऱ्याला होतो. या दसरा उत्सवाच्या दिवशी बोकड्याची गावातून मिरवणूक काढून गडावरील दीपमाळ परिसरातील पायऱ्यांच्या दसरा टप्प्यावर बोकड्यास नेवून पूजा केल्यानंतर बळी देण्याची पूर्वापार प्रथा सुरु होती.