दहावी फेरपरीक्षेचा निकाल 23.66 टक्के
- निकालात घट: पुणे विभागाचा निकाल 23.73 टक्के
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. या परीक्षेत राज्यभरातून 28 हजार 645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी 23.66 इतकी आहे. तर पुणे विभागाचा एकूण निकाल 23.73 टक्के लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी दिली.
राज्य मंडळाकडून दि. 17 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत दहावीची फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 1 लाख 21 हजार 59 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. तर 28 हजार 645 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षीचा निकाल 24.44 टक्के इतका होता. विभागनिहाय निकालात औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक 32.83 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 14.21 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह दोन विषयांत अनुतीर्ण झालेले विद्यार्थीही अकरावी प्रवेशास पात्र ठरले आहेत. एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 60 हजार 554 इतकी आहे.
तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने 2016-17 पासून कौशल्य विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न म्हणता ते कौशल्य विकाससाठी पात्र आहे असा शेरा त्यांच्या प्रमाणपत्रावर मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या संख्या 29 हजार 926 इतकी आहे. गुणपडताळणीसाठी दि. 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी दि. 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे 23.73
नागपूर 27.14
औरंगाबाद 32.83
मुंबई 14.21
कोल्हापूर 17.12
अमरावती 31.77
नाशिक 29.35
लातूर 28.50
कोकण 18.12