गौरी-गणेशाला निरोप ; ४८ हजारांहून अधिक गौरी-गणपतींचे विसर्जन
मुंबई | दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असून गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या गणपतीची आणि त्यानंतर आलेल्या गौरीची षोडशोपचार पूजा केल्यानंतर सोमवारी भाविकांनी त्यांना निरोप दिला. मंगळवारी पहाटेपर्यंत गौरी-गणपतीचा विसर्जन सोहळा सुरू होता. मंगळवारी पहाटेपर्यंत एकूण ४८,०२९ गौरी-गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. करोनाविषयक कडक निर्बंध नसतानाही बहुसंख्य भाविकांनी गौरी-गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे पसंत केले. एकूण सुमारे १७ हजार ६१७ गौरी-गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांमध्ये कडक निर्बंधांमुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. अनेकांनी संसर्गाच्या भितीपोटी गणेशोत्सवात गणेशमूर्ती आणण्याऐवजी घरामधील देव्हाऱ्यातील गणपतीच्या मूर्तीची वा प्रतिमेची पूजा केली होती. त्यामुळे विसर्जनासाठी तुलनेत मूर्तींची संख्याही कमी होती. यावर्षी मात्र घरगुती गणेशमूर्तींची संख्या करोना पूर्व काळाइतकीच आहे. करोनापूर्व काळाप्रमाणेच यंदाही मुंबईत साधारण ४८ हजार गौरी-गणपतीचे विसर्जन झाले.