उजनी धरण भरले 100 टक्के, सोलापूरचा पाणी प्रश्न मिटला
सोलापूर – दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणीही वाढत आहे. ते पाणी वाढून धरणातून भीमा नदीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यापेक्षा कालपासून थोड्या प्रमाणात धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.
काल सायंकाळी सहा वाजता धरणातून एक हजार 600 क्युसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले आहे. याशिवाय कालव्यातून तीन हजार 200, बोगद्यातून 900 क्सुसेकनेही पाणी सोडले जात आहे. आज सकाळी धरणातून भीमा नदीमध्ये पुन्हा अडीच हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.