धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठी ठेवला होता स्फोटकांचा साठा – रावसाहेब कसबे
पुणे – ‘पोलिसांनी कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या घरातून जप्त केलेला स्फोटकांचा साठा हा धर्मनिरपेक्ष विचारांवर हल्ला करण्यासाठी ठेवला होता. यापुढे धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आल्यास त्या सरकारला नियंत्रणात ठेवण्यासाठीचे ते नियोजन होते,’’ असा आरोप ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी मंगळवारी येथे केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. साने गुरुजी स्मारकात झालेल्या व्याख्यानात कसबे यांनी दाभोलकरांच्या कार्याचे महत्त्व सांगताना, ‘कठोर धर्मचिकित्सा’ केली तर ती दाभोलकरांना खरी आदरांजली ठरेल, असे मत मांडले. तर ‘व्यर्थ न हो बलिदान’ या परिसंवादातून मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, तुषार गांधी यांनी विचारवंत, लेखकांच्या हत्या, त्यामागील विचारसरणी, धर्म संकल्पनांचा संघर्ष यावर भाष्य केले. या चारही विचारवंतांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देणे, ही सरकारची जबाबदारी आहे, असे मत व्यक्त केले.
ज्या वैभव राऊतच्या घरातून पोलिसांनी स्फोटके जप्त केली, त्याच्या समर्थनार्थ सात हजार लोक रस्त्यावर उतरणे हे चिंताजनक चित्र आहे,’ असे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या. तुषार गांधी, मेघा पानसरे, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनीही विचार मांडले. नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांनी सूत्रसंचालन केले.