भाजपचा आणखी एक राजकीय भूकंप; चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळाच्या बाहेरच?
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार असे एकापाठोपाठ एक नवनवे राजकीय भूकंप करणाऱ्या भाजपमध्ये आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ता येताच उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेली पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याबाबत पक्ष निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. यामुळे पाटील यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांची सत्ता आल्यानंतर अचानक फडणवीस यांच्या ऐवजी शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद चंद्रकांत पाटील अथवा सुधीर मुनगुंटीवार यांना मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती. पण भाजपने अचानक दुसरा धक्का देत फडणवीस यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ घातली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी एखाद्या सीनियर आमदाराची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या तीन राजकीय भूकंपाच्या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तारातही अनेक धक्के देण्याच्या मनस्थितीत भाजपचे नेतृत्व असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून यापूर्वी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळलेले चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवून पक्ष विस्तारासाठी त्यांचा उपयोग करून घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पद फडणवीस घेणार होते, त्यांनी तसे सुतोवाचही केले होते, पण अचानक त्यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने पाटील यांच्याकडील पद आता कायम राहणार आहे. पाटील यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी आग्रह धरला तर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नक्की होऊ शकेल. पण पक्ष देईल ती जबाबदारी आपण घेऊ, आपण तर कोरे पाकीट आहे, पाकिटावर जे नाव लिहील तिथे आपण पोहोचू अशी भूमिका ते सातत्याने मांडत असतात. यामुळे आता पक्ष त्यांच्या पाकिटावर नवीन पत्ता म्हणून मंत्रिपद लिहिणार की प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवणार याची आता उत्सुकता वाढलेली आहे.
चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तर पुणे किंवा कोल्हापूर अथवा दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे येऊ शकते. तसे न झाल्यास कोल्हापूरचे पालकमंत्री पद विनय कोरे यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पाटील यांच्याकडे यापूर्वी मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पद दोन्ही होते. पक्ष विस्तारासाठी प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच मंत्रिपदाची ताकद असणे आवश्यक आहे. तसा विचार पक्षाने केल्यास त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नक्की होऊ शकतो आणि दोन्हीही पदे त्यांना मिळू शकतात. पण आता भाजप चौथा राजकीय भूकंप करणार की राजकीय समीकरणे जुळवणार याचीच उत्सुकता वाढली आहे.