महाविकास आघाडी सरकार अखेरच्या घटका मोजतंय? बहुमत सिद्ध करावे लागणार!
मुंबई : भाजपकडून (BJP राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारे पत्र मंगळवारी रात्रीच देण्यात आले होते. त्यानंतर काही तासांतच राज्यपालांनी गुरूवारीच (ता. 30) विशेष अधिवेशन बोलावून बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारचा फैसला उद्याच होणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने राज्यपालांची काल भेट घेतली होती. त्यामध्ये राज्यपालांनी राज्य सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र दिले. या पत्राचा संदर्भ देत तसेच राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या बातम्यांचा हवाला देत राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.
राज्यपालांचे पत्र जसंच्या तसं –
1. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अस्थिर असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेच्या 39 आमदारांनी घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिध्द होते आहे.
2. यापार्श्वभूमीवर सात अपक्ष आमदारांचा 28 जून रोजी राजभवनला ईमेल आला आहे. त्यामध्ये सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहूमत चाचणी सिध्द करणे आवश्यक आहे.
3. विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. मला राज्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. त्यांनी पत्रही दिलं असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नसल्याचे मह्टलं आहे. राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
4. मुंबईसह राज्याच्या काही भागात 39 आमदारांविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवालाही धोका आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर माझं असं मत झालं आहे की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहूमत सिध्द करायला हवे.
5. मुख्यमंत्र्यांनी 30 जून रोजी विधीमंडळात बहुमत सिध्द करावे.

बहूमत चाचणीसाठी राज्यपालांचे निर्देश –
1. विधानसभेचे विशेष अधिवेशन 30 जून रोजी सकाळी 11 वाजता होईल. त्यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहूमत सिध्द करावे लागेल.
2. काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विधानभवन परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करावी.
3. बहूमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करावे.
4. प्रत्येक सदस्याला जागेवर उभे राहण्यास सांगून सदस्य मोजणी करावी.
5. कोणत्याही कारणास्तव सभागृहाचे कामकाज तहकूब करू नये. 30 जून रोजीच मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी.
6. अविश्वास ठराव प्रक्रियेचे स्वतंत्रपणे व्हिडीओ शुटींग करून माझ्याकडे सादर करावे.





