मराठवाडा जनविकास संघतर्फे वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार ‘वॉटर टॅंकर’
![Marathwada Janvikas Sangh launches four free water tankers for Warkaris](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/मराठवाडा-जनविकास-संघाच्या-वतीने-वारकऱ्यांसाठी-पाण्याचे-मोफत-चार-वॉटर-टॅंकर.jpg)
पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.५९ मुक्ताबाई महाराज बेळगांवकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प.तांदळे महाराज आळंदीकर या चार दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले. कोरोनाचे ढग गडद होत असल्याने दोन्ही पालखी सोहळ्यात प्रत्येकी ५ हजार मास्क असे एकूण १० हजार मास्क भावीकांना वाटप करण्यात आले.
या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त ह.भ.प., संत महंत आणि सन्माननीय मान्यवर यांना ५ फुट उंचीची ५०० रोपे वाटप करण्यात आली. तसेच राजमाता फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखाताई सांळुखे यांना ४ फुट उंचीची वड, पिंपळ, कडूलिंब, तुळस, हिरडा, बेहडा, करंज, निरगुडी अशी ३०० रोपे वृक्षारोपणासाठी देण्यात आली. तसेच काही ज्येष्ठ वारकाऱ्यांना निवारा मिळावा यासाठी एका टँकरवर छोटासा निवाराही करून देण्यात आला आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/06/IMG-20220621-WA0010-300x169.jpg)
यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद ह.भ.प मारुती कोकाटे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य ह.भ.प.जगन्नाथ पाटील, ह.भ.प वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, ह.भ.प विजूअण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष सचिन भोसले, माजी नगरसेवक विनोद नढे, विक्रांत लांडे पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सा.कार्यकर्ते हुसेन मुलानी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, मारुती बानेवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, सुनील भोसले, प्रदीप गायकवाड, शैलेश दिवेकर संतोष मोरे, नागेश जाधव, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आदींचे सदस्य आदी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी अडचण निर्माण होते. यंदा तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
ह.भ.प. वाघ महाराज म्हणाले, वारीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून देणे, ही वारीच आहे. अरुण पवार करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. अशीच देशाची सेवा आपल्या हातून घडो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शेळके यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.