आम्ही त्यांना गर्लफ्रेंड म्हणून पाहिजे, लग्नाला ते तयार नाही, युतीच्या प्रश्नावर आंबेडकरांचं खोचक भाष्य
मुंबई | “त्यांना आम्ही फक्त गर्लफ्रेंड म्हणून पाहिजे, ते आमच्याबरोबर लग्नाला तयार नाही, अशा खोचक शब्दात प्रकाश आंबेडकरांनी युतीच्या प्रश्नावर भाष्य केलं. आम्ही शिवसेना आणि काँग्रेस बरोबर जायला तयार आहोत, पण त्यांना आमच्याबरोबर यायचंय का, हे आता त्यांनी ठरवावं, असंही आंबेडकर म्हणाले. तसंच वंचित ही भाजपची बी टीम आहे म्हणणाऱ्यांना त्यांनी मित्रत्वाचा सल्ला देताना आमचे मालक होण्यापेक्षा मित्र व्हा, असं आवाहन केलं.
उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीत काय घडलं?
“पाठीमागे शिवसेना आणि वंचित युतीची चर्चा झाली होती. आमदार कपिल पाटील यांनी मला फोन करुन राजकीय चर्चेसाठी आपल्याला मातोश्रीवर जायचं आहे, असं सांगितलं. ठरल्याप्रमाणे मी, कपील पाटील, धनराज वंजारी आम्ही सगळे मातोश्रीवर गेलो. तिथे राजकीय चर्चा झाली. पण संपूर्ण चर्चेत युती हा शब्द देखील काढला नाही. किंवा राजकीय अॅडजेस्टमेंट हा शब्द आला नाही. एकत्र येऊन लढावं, असं आलं. आपण पुन्हा बसू आणि मनामध्ये आहे, ती चर्चा करु, असं आम्हाला सांगितलं गेलं. मग मनामध्ये असलेलं ओठावर येत नाही, तोपर्यंत पुढे कसं जायचं?”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आम्हाला गर्लफ्रेंड म्हणून राहायचं नाही
“लोकांना आमच्याशी मैत्री करायची आहे पण निवडणूक काळात लग्न करायला नकार असतो. मग आम्हाला गर्लफ्रेंड म्हणून राहायचं नाही. शिवसेनेबरोबर जायला हरकत नाही, असा आमचा निर्णय झाला आहे. काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास आमची हरकत नाही. पण भाजपबरोबर कधीच जायच नाही, भाजपबरोबर कधीच राजकीय अॅडजेस्टमेंट करणार नाही”, असं आमचं मत असल्याचं आंबेडकरांनी ठासून सांगितलं.
आमचे मालक होण्यापेक्षा मित्र व्हा, आंबेडकरांचं सेना-काँग्रेसला आवाहन
“वंचित ही भाजपची बी टीम आहे, असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आमचे मालक होण्यापेक्षा मित्र व्हा. आम्ही सेना आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत. प्रश्न आता त्या त्या पक्षाचा आहे. त्यांना जर आमची साथ हवी असेल तर त्यांनी पुढचं पाऊल टाकावं. आमचं कुणीही मालक होऊ शकत नाही. साथीदार होऊ शकता”, असंही आंबेडकर म्हणाले.