मनात खरी श्रध्दा असती तर शासकीय पुजेला मुख्यमंत्री गेले असते – ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह
पुणे – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.
कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅड.अभय छाजेड, नगरसेविका लता राजगुरू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सिंह म्हणाले,”मराठा आणि धनगर आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्यावेळी आरक्षण देण्याच्या भूलथापा त्यांनी मारल्या. एका महिन्यात आरक्षण देण्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यामुळे आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची स्थिती तयार झाली आहे. या परिस्थितीला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे निमित्त करून ते पंढरपुरात महापूजेला आले नाहीत, त्यांच्या मनात श्रद्धा असती तर ते नक्की आले असते.”
“केंद्रातील भाजपप्रणीत सरकारविरोधात एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले तेलगू देसम पार्टी (टीडीपी) यांनीच अविश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांनी मिठी मारून हस्तांदोलन करणे, एका खासदाराला हास्य करीत डोळा मारणे या विषयाला विनाकारण जास्त प्रसिद्धी दिली गेली. परंतु, राहुल गांधीच्या भाषणातील मुद्द्यांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले नाही, याची चर्चा देखील केली नाही. शिवसेना मतदानाच्या दिवशी तटस्थ राहिली म्हणजे त्यांनी देखील मोदींना साथ दिली नाही. सर्व मित्रपक्ष त्यांना सोडून जात आहेत.”