भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाजांची फौज- इशांत शर्मा
लंडन: भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघामध्ये 8 ते 9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे त्यामुळे भारताची वेगवान गोलंदाजी समृद्ध झालेली आहे आणि हीच समृद्धी भारताला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालीकेत विजय मिळवून देइल असा विश्वास भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने व्यक्त केला आहे.
भारतीय कसोटी संघात सध्या मोहम्मद शामी, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारला पाठिच्या दुखण्यामुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजीमध्ये चांगले वैविध्य असल्याचे हा संघ पाहिल्यावर दिसत आहे. त्यामुळे संघातील वेगवान गोलंदाज भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवतील असे मत इशांतने व्यक्त केले आहे.
याबाबत इशांत शर्मा म्हणाला की, भारतात वेगवान गोलंदाज तयार होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारताकडे वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. प्रत्येकाला पर्याय उपलब्ध आहेत आणि संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये निकोप स्पर्धा आहे. त्यामुळे मला असे वाटते की, वेगवान गोलंदाज भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवतील.