विशेष राज्याच्या मागणीबाबत मोदींकडून दिशाभूल – चंद्राबाबू
नवी दिल्ली – आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या विषयावरून तेलगू देसम पक्षाच्यावतीने लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचा आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. चौदाव्या वित्त आयोगाने कोणत्याही राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मनाई केली आहे अशी चुकीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तथापी वित्त आयोगाने अशी कोणतीही मनाई केलेली नाही. अशा कोणत्याही निर्णयात आमची कोणतीही भूमिका नसते असे वित्त आयोगाने म्हटले आहे. विनाकारण त्यांच्यावर मोदींनी खापर फोडून त्यांना यात ओढण्याचा प्रयत्न करू नये अशी सुचनाही चंद्राबाबू यांनी केली आहे.
चर्चेच्यावेळी बोलताना मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे चंद्राबाबु यांच्या पेक्षा अधिक प्रगल्भ आहेत असे विधान केले होते त्याचाही चंद्राबाबूंनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले की मी स्वत: खुद्द मोदींपेक्षाही सिनियर आहे त्यामुळे ते असे विधान कसे करू शकतात ? आंध्रप्रदेश या स्वतंत्र राज्याच्या निर्मीतीनंतर आम्हाला जी आश्वासने केंद्राने दिली होती त्यातून आमची फसगत झाली असून आमच्यावर पुर्ण अन्याय झाला आहे.
आमच्या समस्येवर उपाययोजना करण्याकडे मोदींनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. कालचा अविश्वास ठरावाचा संघर्ष म्हणजे आमची नैतिकता विरूद्ध मोदींचे बहुमत यांच्यातील हा संघर्ष होता असा टोमणाही त्यांनी मारला.