मध्य मुंबईत ३० तास पाणीपुरवठा बंद; वरळीत कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या ठिकाणी जलविद्युत स्थानकात मोठा तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठयात अगोदरच १५ टक्के कपात लागू असतानाच पुढील आठडवडयात मध्य मुंबईत ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
लोअर परळ भागात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी १४ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १५ मार्च दुपारी २ वाजेपर्यंत ३० तासांसाठी दादर, परळ, वरळी, माहीम, माटुंगा, प्रभादेवी भागात तब्बल ३० तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर वरळी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
लोअर परळ येथे सेनापती बापट मार्गावर गावडे चौकात १४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सोमवार, १४ मार्च रोजी सकाळी ८.०० ते मंगळवार, १५ मार्च रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे मध्य मुंबईत दादर, वरळी, प्रभादेवी, धारावी, नायगाव भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर महालक्ष्मी, धोबीघाट, सातरस्ता, डिलाई रोड परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच आवश्यक पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद
डिलाई रोड बी. डी. डी., संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार मार्ग, संपूर्ण प्रभादेवी परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेना भवन परिसर, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, पूर्ण माहीम (पश्चिम) विभाग, माटुंगा (पश्चिम) विभाग, दादर (पश्चिम) विभाग
या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
महालक्ष्मी, धोबीघाट, सातरस्ता या भागात १५ मार्च रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.