मावळमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने डोंगर भागातील ओढे-नाले आटू लागले
पुणे | उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याचे साठे असणारे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील डोंगर भागातील पाणवठे तसेच ओढे-नाले सुकत चालले आहेत. त्यातच टाकवे बुद्रुक व नाणोली गावाच्या मध्यस्थी असलेल्या ओढ्यातील पाण्याची पातळी खालावत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण होत चालली आहे.
टाकवे बुद्रुक व नाणोली या दोन्ही गावांच्या सीमेवर हा ओढा आहे. बागायतदार शेतकऱ्यांना या ओढ्यातील पाण्याचा काहीतरी उपयोग होईल. या आशेने पूर्वी या ओढ्यावर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला होता. मात्र, तसा काही फायदा येथील शेतकऱ्यांना झाला नाही. सध्या पावसाळ्यात शेतकऱ्यांना व गुरख्यांना प्रवासासाठी व हिवाळ्यात जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा या बंधाऱ्याचा वापर होतो. मात्र, हवे तेवढ्या पाण्याचा साठा होत नसल्याने येथील बंधारा हा उन्हाळ्यात पूर्णपणे सुकून जातो. बऱ्याच वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या लोखंडी सर्व प्लेटा पावसाळ्यात पाण्याच्या अतिप्रवाहाने वाहून गेल्या होत्या.
गेल्यावर्षी पाणी अडविण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने लोखंडी प्लेटा बसविण्याचे काम हाती घेतले होते व बंधाऱ्याची होणारी गळती बंद केली होती. मात्र, ओढ्यात मोठया प्रमाणात माती व गाळ साचल्याने पाण्याचा हवा तेवढ्या पाणी साठा होण्यास अडचण होत आहे. लघुपाटबंधारे विभागाने या ओढ्यातील माती व गाळ काढून ओढा खोल केला तर नक्कीच मोठया प्रमाणात पाण्याचा साठा होईल व उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाण्याची होणारी अडचण दूर होईल.