सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना जामीन मंजूर
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांना जामीन मंजूर केला आहे. तर सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या अर्जावरही शशी थरुर यांच्यावतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी थरुर यांच्यावर कलम ४९८ अ (पतीकडून महिलेचा क्रूर छळ) आणि कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थरुर यांना दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
शनिवारी सकाळी शशी थरुर दिल्लीतील पतियाला न्यायालयात हजर झाले. त्यांच्यावतीने नियमित जामिनासाठी अर्ज करण्यात आला. सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्याने आता नियमित जामिनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे सांगत कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला.
शशी थरुर यांच्या वकिलांनी सुब्रमण्यम स्वामी यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या अर्जावर प्रश्न उपस्थित केले. सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टात बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. या प्रकरणातील पोलिसांचा गोपनीय अहवाल देखील सादर करावा, असे स्वामी यांच्यावतीने सांगण्यात आले होते. यावर शशी थरुर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची पुढील २६ जुलै रोजी होणार आहे.