देशाची अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये जगात सर्वात वेगवान ठरेल – अमित शहा
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, २०२१-२२ मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे येईल. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या FICCIच्या ९४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. अमित शहा म्हणाले की, मला वाटतं की, २०२१-२२ मध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरेल. जर आपण दुहेरी आकडा जरी गाठला तरी त्यात आश्चर्य वाटणार नाही.
२०१४ मध्ये महागाईने कळस केला होता. इज ऑफ डुइंगमध्ये आपण मागे होते. बँकिंग व्यवस्था खिळखिळी झाली होती. तसंच १२ लाख कोटींचे घोटाळे आणि भ्रष्टाराचाने देशाची अर्थव्यवस्था पोखरली होती. देशातील जनतेचा केंद्र सरकारवर विश्वास उरला नव्हता असं म्हणत अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. जीडीपीबाबत बोलताना अमित शहांनी म्हटलं की, जुलै-सप्टेंबर या कालावधीत जीडीपी ८.४ टक्के इतका होता. मला पूर्ण विश्वास आहे की, भारत २०२१-२२ मध्ये जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल.
नरेंद्र मोदी यांनी देशात सत्तेची सूत्रे हातात घेतली त्यावेळी लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी होत चालला होता. बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था अपयशी ठरतेय का असा विचार देशात सुरु होता. आमच्या सरकारचे हे यश आहे की बहुपक्षीय लोकशाही व्यवस्थेवर देशाचा विश्वास आम्ही आणखी मजबूत केला असाही दावा अमित शहा यांनी केला.
अमित शहा यांनी म्हटलं की, सरकारवर टीका करणारेसुद्धा मान्य करतील की गेल्या सात वर्षात आम्ही मोठा बदल केला आहे. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही. सर्व हितचिंतकांशी चर्चा केल्यानंतर सर्वच क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. यामुळे पूर्ण देशात एक नवीन विश्वास निर्माण झाल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.