विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई |
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही शोक व्यक्त केला आहे. “मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. विधीमंडळातील एका उमद्या सहकाऱ्यांचे असे अवेळी निघून जाणे क्लेशदायक आहे. जाधव यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमदार चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनीही चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “उत्तर कोल्हापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक – उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील, आग्रही राहणारा लोकप्रतिनिधी हरपला आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली,” असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
- चंद्रकांत जाधव यांची राजकीय वाटचाल
चंद्रकांत जाधव व त्यांच्या परिवाराचा कोल्हापूरला आजच्या राजकारणातील वावर विरोधक म्हणून राहिला होता. यापूर्वी त्यांनी एकदा महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी उमेदवारी मागितली होती, पण ती नाकारली गेली. त्यानंतर त्यांनी भाऊ संभाजी यांना तीन वेळा तर गतवेळी बंधूसह पत्नी प्रेमला यांना महापालिका निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेचे दोन वेळा विजयी झालेले आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता.