रिक्षा भाडेवाढ मिळवली, आता कल्याणकारी मंडळासाठी एकजुटीने लढू – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड | पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या विभागांमध्ये पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यास रिक्षा मीटर साठी तीन रुपये भाडे वाढ देण्यात आली असून पुढील प्रत्येक किलोमीटर साठी 14 रुपये करण्यात आलेले आहे. ही भाडेवाढ म्हणजे रिक्षाचालक-मालक यांनी दिलेल्या लढ्याला यश आले. एकजुटीने लढा दिल्यामुळे आपण यशस्वी झालो. ज्या पद्धतीने आपण मीटर भाडेवाढीच्या मुद्द्यांमध्ये एकत्र येऊन लढलो. त्याच पद्धतीने आता कल्याणकारी महामंडळाच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊन लढू, यातही आपण विजय मिळवू, असा विश्वास महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
कांबळे म्हणाले की, रिक्षा मीटर भाडेवाढ संदर्भात हकीम समिती यांच्या सूत्रानुसार दर एक मे ला आम्हाला भाडेवाढ मिळत होती. परंतु, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात त्यांनी हकीम समितीचा निर्णय रद्द करून खटुआ समिती नेमली. या समितीने देखील भाडेवाढीची शिफारस केली. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी अशी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर संघटनांचे आग्रही मागणी होती.
यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक पटेल उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, मोहम्मद शेख किरण एरंडे मुराद काजी अन्सारी शेख आयाज शेख विलास केमसे संजय गुजलेकर यांनी वेळोवेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देऊन या विषयाचा पाठपुरावा केला. सर्वांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला असून ज्या पद्धतीने आम्ही तुटपुंजी भाडेवाढ रद्द करून रिक्षाचालकांची हक्काचे भाडेवाढ म्हणून घेतली याच पद्धतीने रिक्षा चालक मालकांनी आता महाराष्ट्र सरकारने रिक्षा चालक मालकांसाठी जाहीर केलेले फसवे कल्याणकारी महामंडळ रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही कांबळे म्हणाले.