“मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही, करोनाला एकच औषध..”; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य
!["I have not been vaccinated and I will not be vaccinated, only one drug for Corona ..."; Statement of Kirtankar Indurikar Maharaj](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Indurikar-Maharaj.jpg)
पुणे |
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी करोना लसीबद्दल एक विधान केल्याने खळबळ उडाली आहे. मी लस घेतली नाही आणि घेणारही असे विधान इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात केले आहे. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५०० पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती होती तसेच स्थानिक महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. “ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन करायचे काय? करोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकावून पाहिले नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी करोनकाळात महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याचं आवाहन केलं होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर यांनी एक लाखांची मदत दिली होती. लॉकडाउनमुळे रोज हातावर पोट असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते. दरम्यान, याआधी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महारांज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.