“भ्रष्टाचारी आघाडीला…” रस्त्यावरील खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
![Amit Thackeray attacks the Thackeray government from the potholes on the road](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/amit-1.jpeg)
मुंबई |
पाऊस आला की मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसू लागतात. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही घडत आहेत. मुंबईतील खड्ड्यांबाबत लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई आणि त्याच्या आसपासच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. कोंडी होण्याचे सर्वात मोठे कारण खड्ड्यांना सांगितले जात आहे. राज्यातील अनेक महामार्गावर देखील हीच परीस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील खड्ड्यांच्या दुरुस्ती व उपाययोजनांचा काल वर्षां निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला.
दरम्यान, या प्रकरणात ट्विट करत मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. “रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डे विरोधी आंदोलन करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.” अशा शब्दात अमित ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
https://www.facebook.com/amitthackerayofficial/posts/1540134559674224