अखेर कंगना कोर्टात हजर : जावेद अख्तर मानहानी प्रकरण
मुंबई – आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंगनाला कोर्टानं जावेद अख्तर प्रकरणात चांगलच फटकारलं होतं. त्याचं कारण अख्तर यांनी आपल्या मानहानी प्रकरणात दाखलेल्या याचिकेवर कंगना कोर्टात हजर होत नव्हती. अखेर ती आज उच्च न्यायालयात हजर झाली आहे. त्यावरुन आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींमधील वाद मोठ्या टोकाला जावून पोहचला होता. एकमेकांवर केलेले आरोपही सोशल मीडियावर अनेकांच्या चर्चेचा विषय झाले होते. यासगळ्यात जावेद अख्तर यांनी आक्रमक होत कंगनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.
जर आज कंगना कोर्टात हजर झाली नसती तर तिच्याविरोधात अटक वॉरंट कोर्टाला काढावा लागला असता. मात्र आजच्या सुनावणीला कंगना हजर झाली आहे. यापूर्वीच्या सुनावणीला आपल्या प्रतिनिधी मार्फत कंगना सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करत होती. त्यावरुनही तिला कोर्टानं फटकारलं होतं. कोर्टानं जेव्हा कंगनाच्या वकिलाला ती गैरहजर राहण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी तिची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितलं होतं. त्यावेळी मेट्रोपॉलिटन कोर्टानं हे कारण लक्षात घेऊन त्या सुनावणीला हजर न राहण्याबाबत दिलासा दिला होता. याशिवाय कोर्टानं सांगितलं होतं की, यापुढील सुनावणीला ती हजर न राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जाहीर करण्यात येईल. यामुळे कंगनानं कोर्टात हजर राहण्यास प्राधान्य दिलं आहे.
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यावर केलेल्या आरोपावरुन तिची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. तिनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अख्तर यांच्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आरोपांमुळे अख्तर यांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप अख्तर यांनी आपल्या याचिकेत केला होता. काही झालं तरी कंगनाला आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असं त्यांनी सांगितलं होतं. आज न्यायालयात या सुनावणी दरम्यान काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.