breaking-newsक्रिडा
दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचे भारताला विजेतेपद
दुबई: दुबईत सुरु असलेल्या दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेचं भारताने विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत भारताने तुल्यबळ प्रतिस्पर्धी इराणचं आव्हान सहज मोडुन काढल. या स्पर्धेत भारतासह इराण, पाकिस्तान, कोरिया, केनिया, अर्जेंटिना हे संघ सहभागी होते. सहा देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेमध्ये भारताने वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात इराण संघाचा 44-27 असा पराभव करीत भारतीय संघाने चॅम्पियनचा मान पटकाविला. यावेळी साखळी सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंत एकही सामना न गमावता भारताने स्पर्धेत अजिंक्य राहण्याचा मान पटकावला.
आतापर्यंतच्या साखळी सामन्यांमध्ये भारताला एकाही प्रतिस्पर्ध्याकडून तगडं आव्हान मिळालं नव्हतं. मात्र भारताखालोखाल इराणचा संघ कबड्डीत मातब्बर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे अंतिम सामना एकतर्फी होणार नाही अशी अनेकांना आशा होती. मात्र भारताने पहिल्या सत्रापासून सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखत इराणचा प्रतिकार मोडून काढला. कर्णधार अजय ठाकूर, रिशांक देवाडीगा, मोनू गोयत यांच्या चढाईच्या आधारावर भारताने मध्यांतरापर्यंत 18-11 अशी आघाडी कायम ठेवली होती.
मध्यांतरानंतर इराणने भारताला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. अजय ठाकूर आणि भारताच्या अन्य खेळाडूंच्या पकडी करुन इराणने काहीकाळ भारताच्या गोटात चिंतेच वातावरण तयार केलं होतं. मात्र मोहित छिल्लर आणि गिरीश एर्नाक या बचावपटूंनी, बचावामध्ये गुणांची कमाई करत भारताचं आव्हान कायम राखलं.
दुसऱ्या सत्रात भारताने काही सुपर रेडही केल्या. अखेर दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताने 44-27 अशा फरकाने इराणवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं.
सामन्याच्या पहिल्या सत्रात स्टेडियममध्ये विद्युत खंडित झाली होती. ज्यामुळे 10 मिनिटांचा खेळ थांबला होता. दुसजया सत्रात इराणचा कर्णधार अमीर होस्सेइन मालेकी याने भारतीय संघावर “रफ प्ले’चा आरोप लावला ज्याचे पंचांनी खंडन केले. दरम्यान, दोन्ही संघ यापूर्वी 2016 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले होते. ज्यात अजय ठाकूर याने भारताकडून 9 गुण मिळवून देत महत्त्वाची भूमिका बजावली होती.