भाजपने स्थायी समिती अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगावे – नीलम गोऱ्हे
पिंपरी – भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सहकारी भ्रष्टाचाराविरोधात बोलत असतात. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांना लाच प्रकरणात ‘एसीबी’ने अटक केली. याबाबत भाजपने योग्य भूमिका घेऊन स्थायी समिती अध्यक्षांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे, असे स्पष्ट मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
गोऱ्हे यांनी आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड महापालिकेत येऊन राज्य सरकारच्या योजना, कोरोना काळातील सरकारने केलेल्या मदतीचे वाटप झाले आहे का, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख सचिन भोसले, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर उपस्थित होते.
ठाकरे कुटुंबावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणे हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुख्य व्यवसाय आहे. तो त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. ठाकरे कुटुंबियांवर टीका केली नाही. तर, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा भेटणार नाहीत की केंद्रीय मंत्रीपद मिळणार नाही. ठाकरे कुटुबियांवर टीका करतात म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. देवेंद्र फडणवीस त्यांच्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतात. फडणवीस राणेंच्या पाठीमागे फरफटत चालले असल्याचेही गो-हे म्हणाल्या.