“आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात,” दानवेंचा भागवत कराड आणि कपिल पाटलांना टोला
!["It took you 42 years to become a minister, you are lucky," said Danve's Bhagwat Karad and Kapil Patil.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/BJP-Raosaheb-Danve.jpg)
मुंबई |
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून संधी मिळालेल्या राज्यातील चार नव्या मंत्र्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा सत्कार करण्यासाठी दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, पण तुम्ही नशीबवान आहात असं म्हणत भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मिश्कील टोला लगावला.
“आपण केंद्रात मंत्री झालात. आता हा अनुभव वेगळाच आहे. आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली. मला ४२ वर्ष लागली पण तुम्ही सहा महिन्यात काम केलं. नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काम मंत्रिमंडळात कराल,” असं रावसाहेब दानवे भागवत कराडांचा उल्लेख करत म्हणाले. “कपिल पाटीलदेखील मी नवीन आहे म्हणाले. तुम्ही सात वर्षात राज्यमंत्री झालात हे पण काही कमी नाही. मला ४२ वर्ष लागली. तुमच्यासारखे नशीबवान लोक सापडणं कठीण आहे,” असा मिश्कील टोला रावसाहेब दानवेंनी लगावला.