संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी राज्याचा साडेबाराशे कोटी रुपयांचा निधी
जालना |
करोना प्रादुर्भावास प्रतिबंध केल्यासच राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवता येऊ शकते. त्यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळणे आणि यासंदर्भात तज्ज्ञांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका गृहीत धरून राज्य शासनाने आवश्यक पूर्वतयारी केलेली आहे. औषधी, प्राणवायू, मनुष्यबळ इत्यादींबाबत उणीव राहू नये यासाठी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात यासाठी एक हजार २५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे सांगितले.
मागील आठ-दहा दिवसांत स्पेन, हॉलंड, म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश इत्यादी देशांत करोना रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे भारतानेही या संदर्भात सावध राहण्याचा इशारा देशपातळीवरील करोना कृतिदल गटप्रमुखांनी अलीकडेच दिला आहे. या पार्श्वभूमीवर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना टोपे म्हणाले,की राज्यात अद्याप तिसरी लाट आलेली नाही. राज्यातील दहा जिल्ह्य़ांतील करोनाबाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असले तरी दररोज ते काही प्रमाणावर कमी होत आहे. पहिल्या लाटेत राज्यात २० लाख व्यक्ती करोनाबाधित झाल्या होत्या तर दुसऱ्या लाटेत ही संख्या ४० लाख होती. तिसरी संभाव्य लाट आली तर ६० लाख करोनाबाधित आढळतील असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
दुसऱ्या लाटेत राज्यास १७०० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता होती. जर संभाव्य तिसरी लाट आली तर चार हजार मेट्रिक टन प्राणवायू लागेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने पूर्वतयारीची सूचना जिल्हाधिकारी आणि शासकीय करोना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.रविवापर्यंत राज्यात जवळपास चार कोटी ५५ लाख करोना चाचण्या झाल्या. यापैकी ६२ लाख १४ हजार म्हणजे १३.६६ टक्के नमुने करोनाबाधित निघाले. ५९ लाख ८० हजारांपेक्षा अधिक म्हणजे ९६.२४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.