कात्रज-कोंढवा रस्ता निविदेची “वाट’ मोकळी
- ऑगस्टअखेरपर्यंत कार्यवाही : शिवसेनेच्या आंदोलनानंतर आयुक्तांचा खुलासा
पुणे – कात्रज- कोंढवा रस्त्याच्या निविदा रद्द करण्यामागे कोणतेही गुपित नसल्याचे सांगत, या रस्त्याची निविदा प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शकपणे करण्यासाठीच या प्रकल्पाची निविदा पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्याचा खुलासा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी मुख्यसभेत केला. तसेच या रस्त्याच्या कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ही निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवली जाईल, असा दावा त्यांनी केला.
कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरण वारंवार निविदा रद्द केल्याने पुढे जात असून सर्व सामान्य नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत सुमारे 65 जणांना या रस्त्यावर आपला जीव गमवावा लागल्याने प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका संगीता ठोसर यांच्यासह इतरांनी आंदोलन केले. तसेच हे काम मार्गी न लागल्या आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. या आंदोलनानंतर महापौरांच्या आदेशानुसार, महापौर मुक्ता टिळक यांनी या कामाबाबत खुलासा करण्याचे आदेश आयुक्त राव यांना दिले.
आयुक्त राव म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांमध्ये कोणतेही गुपित नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम केले जाणार आहे. मागील निविदा प्रक्रिया रद्द करण्यामागे वेळ नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. कोणतेही काम सुरू करण्याअगोदर सुरू करण्यापूर्वी 120 दिवसात वर्कऑर्डर देणे अपेक्षित आहे. मात्र, हा कालावधी 180 दिवस झाल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या रस्त्याचे काम लवकर होण्यासाठी नवीन निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी नवीन प्रकल्प आराखडा तयार करून त्याला एस्टिमेट समितीने मान्यताही दिलेली आहे. त्यानुसार, 21 दिवसांची मुदत असून निविदा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. या निविदा येताच त्याची तातडीने छाननी करून त्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोणत्याही स्थितीत स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवल्या जातील. तसेच या रस्ते कामासाठी प्रशासनाच्या ताब्यात 42 टक्के जागा असून ही निविदा प्रक्रिया सुरू असतानाच; प्रकल्पासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून काम पूर्ण होण्यापूर्वी जास्तीत-जास्त जागा ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.