नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या- प्रविण दरेकर
मुंबई – जेआरडी टाटा यांचे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. पण नवी मुंबईचा विकास दि. बा. पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे त्यांचं नाव द्यावं असा भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यानुसार विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्यावं अशी भाजपची भूमिका आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर समाज भूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे, असं दरेकर म्हणाले.
पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही भाजप पक्षाची भूमिका आहे, असं दरेकरांनी सांगितलं.
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावं, अशी मागणी ठाणे, रायगड, पालघरमधील स्थानिक भूमीपुत्रांनी मांडली आहे.