विलगीकरण कक्ष असलेली रेल्वे गाडी ‘यार्डात’ दाखल
- २२ दिवसांत केवळ चार रुग्णांना लाभ; लाखो रुपयांचा खर्च वाया
पालघर |
करोना रुग्णांसाठी काळजी केंद्राप्रमाणे विलगीकरण कक्ष असलेल्या रेल्वे डब्यांच्या गाडीला पालघरमध्ये विशेष प्रतिसाद न मिळाल्याने ती पुन्हा वलसाडला परत पाठविण्यात आली आहे. केवळ २२ दिवसांच्या पालघर मुक्कामात अवघ्या चार करोना रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. त्यामुळे गाडीच्या व्यवस्थापनावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला. लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तसेच प्रवासी संघटनांनी प्राणवायूची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यासाठी जिल्ह्यत सुविधा नसल्याने या गाडीची मागणी रेल्वेकडे केली होती. प्रत्यक्षात गाडी दाखल झाल्यानंतर हे डबे रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची सुविधा करोना काळजी केंद्राप्रमाणेच उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट झाले. ही गाडी फलाट क्रमांक तीनवर उभी करण्याचा निर्णय त्रासदायक ठरत असल्याचे दिसून आले.
परिणामी विलगीकरण सुविधा असणाऱ्या २३ डब्यांच्या गाडीमध्ये फक्त चार रुग्णांनी त्याचा लाभ घेतल्याचे आढळून आले. जिल्ह्यत व पालघर तालुक्यात वेगवेगळ्या करोना काळजी केंद्रांमधील ५० टक्के खाटा रिकामी असल्याचे आढळून आल्यानंतर त्यातच गैरसोयीमुळे मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता या गाडीची सेवा व त्या अनुषंगाने केलेला करारनामा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २२ मेच्या सायंकाळी ही विशेष गाडी गुजरात राज्यातील वलसाड रेल्वे स्थानकाकडे रवाना झाल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
- ३८६ डबे रुग्णांसाठी सज्ज
रेल्वे प्रशासनाकडे ३८६ विलगीकरण डबे तयार असून विविध राज्यांकडून येणाऱ्या मागणीच्या अनुषंगाने त्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले. रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालघर येथे असलेले २३ विलगीकरण डबे वलसाड यार्डमध्ये स्थलांतरित करून ठेवण्यात आले आहेत. पालघर येथे प्रतिसाद मिळाला नसला तरी नंदुरबार येथे १३० पेक्षा अधिक रुग्णांनी रेल्वेच्या या विशेष सेवेचा लाभ घेतला आहे, असे सुमित ठाकूर यांनी सांगितले.





