“साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही पंढरपूरात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं”
पुणे |
देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची. येथील पोटनिवडणुकीत भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट लढत झाली. ज्यामध्ये भाजपाचे समाधान अवताडे यांनी सध्या विजयी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यांचा विजय हा जवळपास निश्चत मानला जात आहे. ही निवडणूक महाविकासआघाडी व भाजपाकडून एकप्रकारे प्रतिष्ठेची करण्यात आल्याचं प्रचार कालावधीत दिसून आलं होतं. त्यानंतर आता निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झाल्याने, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये महाविकासआघाडीवर निशाणा साधला गेला आहे. ”महाविकास आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
#महाविकास_आघाडीची पूर्ण ताकद
@AjitPawarSpeaks ठाणं मांडून बसलेले,टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे @Jayant_R_Patil यांचे दौरे,@NANA_PATOLE यांची सभा
प्रशासनाचा फौजफाटा साम,दाम,दंड,भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 2, 2021
भाजपा वि. महाविकासआघाडी थेट सामना!
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न ठरला मुद्दा!
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा आणि राजकीय सभांचा विषय ठरला होता. त्याशिवाय, राज्यातील करोनाच्या संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपाकडून मोठा करण्यात आला होता. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं दिसून आलं.
वाचा- “रोज गोमूत्र प्यायल्यास करोना होणार नाही”; भाजपा नेत्याचं वक्तव्य