देशात कोरोना स्थिती भयंकर, मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला बडे अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. थोड्याचवेळात या बैठकीला सुरुवात होणार असून यावेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा होणार असल्याचे समजते.
गेल्या २४ तासांत देशात २ लाख ७३ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. तर १ हजार ६१९ बाधितांंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
तातडीने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा: संजय राऊत
कोरोनामुळे देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी सोमवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसही उपलब्ध नाही. हे दुसरे तिसरे काही नसून संपूर्णपणे गोंधळ माजल्याचे चित्र आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने संसदेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करावे. या अधिवेशनात कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या सद्यपरिस्थितीवर चर्चा व्हावी, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमित शाह लॉकडाऊनबाबत काय म्हणाले?
देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद्र सरकार घाईघाईने घेणार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तुर्तास घाईघाईने लॉकडाऊन करावे, अशी परिस्थिती नाही. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण या विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
गेल्यावर्षी लॉकडाऊन लावला तेव्हा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध किंवा लस नव्हती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. केंद्र सरकार तत्पर नाही, असे नव्हे.आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत, दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यावेळी मीदेखील हजर होता. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत. परंतु, घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे, अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शाह यांनी म्हटले.