आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार- देवेंद्र फडणवीस
मुंबई |
भांडुपमधील ड्रीम्स मॉल सनराइज रुग्णालयात लागलेल्या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत, घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, त्यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केली जाईल असं आश्वासन देखील दिलं. तर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर टीका केली व घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले, “जी घटना घडली आहे त्यामध्ये सरकारचा बीएमसीचं अक्षम्य दुर्लक्ष व ढिसाळपणा हा स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो आहे. या संदर्भात आता काही फार बोलणं योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. पण मला हे समजत नाही की आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असं वाटतं या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही, यासाठी घोषणा नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही ही सरकारच्यावतीने झाली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे.”