ममता बॅनर्जींना दुखापत हल्ल्यामुळे नाही तर अपघातामुळे, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्याने तेथे नियमित नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यातच, तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर प्रचारादरम्यान हल्ला झाल्याने त्यांना दुखापत झाली, यावरून प्रचंड राजकारण सुरू झालं आहे. पण ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचे कोणतेही पुरवे नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि अन्य दोन विशेष निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावरुन निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की, ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. ममता बॅनर्जी यांना झालेल्या दुखापत ही कुठल्याही हल्ल्यातून झाली नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Election Commission of India (ECI) rules out an attack on CM Mamata Banerjee. Details to follow: ECI decision based on a report by state's Observers and Chief Secretary
— ANI (@ANI) March 14, 2021
निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही. त्यांना झालेली दुखापत ही छोट्याशा अपघातामुळे झाल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. स्पेशल ऑब्जर्व्हर अजय नायक यांनी दिलेल्या अहवालानुसार निवडणूक आयोगाने असं म्हटलं आहे. हा अहवाल शनिवारी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालावर निवडणूक आयोग असमाधानी होतं. त्या अहवालात ममता बॅनर्जी यांना दुखापत नेकमी कोणत्या कारणामुळे झाली, हेच सांगितलं गेलं नव्हतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत एक सविस्तर अहवाल मागवला होता.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यात 3 एस्कॉर्ट कार, 2 इंटरसेप्शन कार, महिला पोलिसांची एक गाडी, रुग्णवाहिका, सुरक्षारक्षकांच्या तीन गाड्या, टेल कार आणि स्पेअर इंटरसेप्शन कारचा समावेश असतो. चार पायलट कार ताफ्याच्या नेहमी पुढे असतात. यामध्ये डीएसपी आणि सब इन्स्पेक्टर दर्जाचे पोलीस अधिकारी असतात. मग इतक्या कडेकोट सुरक्षेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला होऊच कसा शकतो, अशी शंका भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे.