नागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर- शिवसेना राज्यात भाजपला टक्कर देण्याची भाषा करत आहे, मात्र भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच शिवसैनिकांमध्ये गटबाजी उफाळून आल्याचं दिसत आहे. नाराज शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. दुष्यंत चतुर्वेदी संपर्क प्रमुख नको, अशी मागणी नागपुरातील नाराज शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
नागपूर शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन गटांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासोबतच नाराज शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेतील गटबाजी उघड झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
वाचा :-नाशिक महापालिकेत शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग
तीन माजी जिल्हाप्रमुखांचं उद्धव ठाकरेंना पत्र
नागपूर शहरातील तीन माजी जिल्हाप्रमुखांच्या सहीचं पत्र उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे. शेखर सावरबांधे, सतीश हरडे, बंडू तागडे यांचे गट आक्रमक झाले आहेत. सध्याचे नागपूर शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी आहे. त्यामुळे नागपुरात दुसरा संपर्कप्रमुख देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी मुंबईतील नेत्यांनी समन्वय करावं, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. २६ जानेवारीला नाराज शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार आहेत.