अन्यथा महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा उद्रेक – संभाजी ब्रिगेड
पिंपरी | प्रतिनिधी
केंद्र सरकारने लोकसभेत संमत करून घेतलेली कृषी विषयक तीन विधेयके रद्द करावे. अन्यथा दिल्लीत व हरियानात होत असलेल्या आंदोलनाचा कारवा महाराष्ट्रात येईल. त्यानंतर होणाऱ्या उद्रेकाला सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रविण कदम यानी दिला. देशभरातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडच्या वतीने अप्पर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये तालुका व जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले. दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा दिला.
या वेळी शहराध्यक्ष प्रविण कदम, संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या स्मिता म्हस्कर, शहर सचिव श्रीकांत गोरे, कोषाध्यक्ष तेजस गवई, संघटक सतीश घावटे मर्दान आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे, शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा. नवीन कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे सांगितले जात आहेत. परंतु ते शेतकरीविरोधी कायदे आहेत. त्यामुळे सध्या पंजाब-हरियाणा सहित देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीला पोहोचले आहेत. या आंदोलनाचा शक्तीपात करण्यासाठी आपल्या सरकारी यंत्रणेने मध्येच रस्ते खोदणे, अवजड वहाने उभी करणे, लाठीमार, अश्रुधूर, भर थंडीत आबालवृध्दांवर पाण्याचा मारा करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निषेध करण्यात आले. दिल्लीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या या संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या मागण्या समजून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता, सर्व मागण्या कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
……………………………..